Sunday, October 2, 2011

अशीही नवरात्र..


नवरात्र सुरु होण्यापूर्वीचा रविवारचा दिवस. खूप दिवसांनी घरात सर्वजण आज्जी-आजोबांकडे गेट-टुगेदर साठी जमलेले.
दुपारी जेवण झाल्यावर घरातले मोठे लोक, म्हणजे बाबा-काका-आजोबा.. आरामात गप्पा मारत पडलेले..
घरातले यंग जनरेशन मात्र बाहेर.. मुलं क्रिकेट खेळण्यात तर मुली शॉपिंगमध्ये दंग.

काहीतरी बोलण्याचा विषय काढायचा म्हणून घरात असलेल्या सदस्यांपैकी एकाने सुरु केले.."या वेळेस नवरात्र थोडी वेगळ्या पद्धतीने साजरी करूया का??"
दुसरा : वेगळ्या म्हणजे कशा? दरवर्षी आपण असंच म्हणतो..पण नेहमी आपला प्लान फ्लॉप होतो..
पहिला : आपण काहीतरी ठरवूया ना सगळे मिळून.. म्हणजे नेहमीपेक्षा थोडंतरी काही नवीन असायला हवं..

एव्हाना घरातल्या बायका, आई, आज्जी, काकू सगळ्या स्वयंपाकघरातली कामं आटपून हॉलमध्ये त्यांच्या गप्पांत सामील झाल्या होत्या..
एक-एक जण नवीन शक्कल लढवत होता, कि नवीन काय करायचं नवरात्रीला..
मग एक काका म्हणाले, "आता कॉलनीत जी सार्वजनिक देवी बसते.. ती तर काही आपल्या घरात बसवणं शक्य नाही.. पण वाटलं तर सगळा खर्च आपण देऊ शकतो.."
त्यावर दुसरं कोणीतरी म्हणालं, "नाही.. नको.. सार्वजनिक देवी हि संपूर्ण कॉलनीसाठी आहे.. आपल्याला जे काही करायचे आहे ते आपल्यासाठी आणि शक्यतो घरातच.."
सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला..
घरातलाच  दहा वर्षांचा एक छोटा सदस्य हॉलमध्ये येत म्हणाला, "आपण सगळ्यांनी मिळून नवरात्रीत नऊ दिवस चप्पल सोडली तर..??" (त्याची काय चूक म्हणा.. तो हि आपल्या परीने सुचवू पाहत होता..)
आज्जी म्हणाली, "बाळा, तुला इथलं किराणा दुकान माहित आहे ना.. स्वयंपाकघरातल्या ओट्यावरची चिठ्ठी घेऊन थोडं समान आणशील?.. तुला खीर आवडते ना?.. आज संध्याकाळी करून देईन.."
तो हि खुश होऊन, "हो आज्जी.." म्हणत पळाला..

त्याला बाहेर पाठवल्यावर पुन्हा मोठे चर्चा करू लागले..
त्यातल्या एकाने सुचवलं, "आपण नवरात्रीत तुळजापूरला गेलो तर?? कुलदेवतेचं दर्शनही होईल अन नवरात्रही चांगली साजरी होईल.."
एक काकू बोलली, "नाही.. नको.. दहा दिवस तुळजापूरमध्ये राहणं शक्य नाही.. पोरांच्या शाळा-कॉलेजना सुट्ट्या नाही मिळणार एवढ्या.."
"हो बरोबर आहे.. आपल्यालाही ऑफिसमधनं दहा दिवस सुट्टी मिळणं कठीणच आहे..", आणखी एकजण म्हणाला..
"ओके.. मग घरातच ठीक आहे.. आपण रोज एकशे अकरा आरत्या म्हणूयात का? मोठी पूजा ठेऊन.."
"एकशे अकरा?? एकशे एकवीस म्हणायचं होतं ना.. अरे काय भाऊ..!! कितीही मोठं आरती संग्रहाचं पुस्तक आणलं तरी एवढ्या आरत्या त्यात सापडणार नाहीत.. मुळात सगळ्या भाषेतल्या देवीच्या सगळ्या आरत्या मिळूनही एकशे अकरा होणार नाहीत.. आता सगळ्या भाषेतल्या आरत्या वाचता येत नाहीत..तो भाग वेगळा.."
"ओके ओके.. आरत्या कॅन्सल.. दुसरा काहीतरी विचार करू.."
"अरे, आपल्याकडे दसऱ्याला मोठी आरती असते ना.. तेव्हा जोगवा मागतात.. तसा रोज मोठी आरती अन जोगवा.."
"घरातल्या घरात कुठे जोगवा असतो का? काहीपण ना राव!! आता म्हणू नका कि शेजारच्यांकडे जाऊन जोगवा मागुया म्हणून..", कोणीतरी मस्करी करत बोललं.
"हो.. खरं तर घरातल्या घरात जोगवा ही पद्धतच चुकीची आहे..", आणखी एकजण.
"मग ब्राम्हणभोजन.. त्याबद्दल काय मत आहे?? तसंही दसऱ्याला असतंच ना.. मग आपण ठरवून रोज नऊ दिवस एका ब्राह्मणभोजन देऊ शकतो.."
"हम्म.. हे थोडं ठीक वाटतंय..".. सगळ्यांचं त्यावर एकमत झालं.

संध्याकाळी.. खेळायला गेलेली मुलं अन शॉपिंगला गेलेल्या मुली परतल्यानंतर त्यांना कुणकुण लागली, कि घरातली मोठी मंडळी यावेळेस नवरात्रीला नवीन काहीतरी करण्याचं ठरवत आहेत.. आणि त्यांनी दररोज ब्राह्मणभोजन द्यायचं ठरवलंय..
त्यांनीही आपली एक मीटिंग बोलावली अन त्यावर चर्चा करत, नवीन काही सुचवण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करू लागले.. शेवटी त्यांचंही एकमताने ठरलं..

रात्री सर्वजण एका ठिकाणी जेवायला जमल्यावर मुलांपैकी एकाने विचारलं, "काय मग? नवरात्रीत नऊ दिवस ब्राम्हणभोजन द्यायचं ठरवलंय म्हणे.. आम्हा मुलांना यावर काही सुचवायचं आहे.. म्हणजे तुम्हाला आवडलं, पटलं तरच ते अंमलात आणलं जाणार आहे.."
मोठी मंडळी कान देऊन ऐकत होती.. सर्वांची उत्सुकता ताणली गेली..
"आम्हा मुलांना वाटतं, कि आपण ब्राम्हणभोजनाऐवजी एखाद्या गरिबाला अन्नदान दिलं तर ते जास्त चांगलं राहील..म्हणजे रोज दारात भांडेवाली, कपडेवाली, दुधवाला, इस्त्रीवाला, भाजीवाला.. भरपूर लोक येतात.. त्यांना अन्नदान देणं म्हणजे एक पुण्यच आहे ना..!! आपणच म्हणता, कि माणसातला देव पाहायला हवा.. "
मोठी मंडळी कौतुकमिश्रित भारावलेल्या नजरेने मुलांना न्याहाळू लागली.. शेवटी संस्कार म्हणावेत ते हेच..!! 
"खरंच चांगलं सुचवलंत रे पोरांनो.. नवरात्रच काय अगदी उद्या येणारी सर्वपित्री/दर्श अमावस्याही अशीच साजरी करू.. यावेळेसची नवरात्र खरोखरच एका वेगळ्या, नवीन आणि चांगल्या पद्धतीने साजरी होणार आहे.."

मला तर त्यांची ही पद्धत खूप आवडली.., कदाचित तुम्हालाही आवडली असेल..

Monday, September 26, 2011

आज्जीचं घर


आजही मला ते घर आठवतं. खरं तर ते माझ्या आज्जी-आजोबांचं, म्हणजे माझ्या आईचे आई-वडील, यांचं घर.. पण मी आज्जीचंच घर म्हणते..
नांदेड हौसिंग सोसायटी मध्ये, नागसेन नगर जवळ, 'समर्थ निवास, १९७३' लिहिलेलं ते घर अजूनही तेवढ्याच दिमाखात उभं आहे..
तीन महिन्यांची होते तेव्हापासून ते दहा वर्षांची होईपर्यंत आणि आम्हा १६ मामे-मावस भाऊ-बहिणींमध्येही सर्वात जास्त मी काळ त्या घरात आज्जी-अण्णा सोबत राहिलेय..माझे सगळे वाढदिवस तिथेच साजरे केलेय..
आमचं घरही त्याच्या मागच्याच गल्लीत, परळकरच्या वाड्यात होतं..
अण्णा मला नेहमी आठवणी काढून सांगतात, लहान होते तेव्हा माझ्यासाठी घरात पाळणा बांधला होता, अण्णा मला दिवसभर झोका द्यायचे..
माझ्यासाठी बनवलेली छोटी गादी अजूनही घरात वरच्या मजल्यावर पडून आहे..
घरात खाली तीन आणि वर दोन अशा पाच खोल्या आहेत आणि बाहेर खूप मोठे अंगण जिथे जवळपास सगळीच फुलझाडं अन पेरूचे, बोरीचे झाड आहे.
अण्णांना झाडांना, फुलांना हात लावलेलं अजिबात चालायचं नाही.. घराचे गेट, ज्याला फाटक म्हणायचे, तेही उघडं ठेवलेलं चालायचं नाही आणि आम्ही पोरं दरवेळी हे विसरायचो.. मग अण्णा ज्याच्यावर रागावतील त्याला चिडवायचो..
घराच्या बाजूनेच नागसेन नगर चालू होतं.. तिथली उनाड पोरं यायची, पेरू, आंबे, बोरं पडायला.. ती अण्णांना चिडवायची, त्यांचे नाव 'तुकारामपंत पाठक' असूनही 'अण्णा पाठक' म्हणायची.. त्यातलंही पाठक चुकीचं.. 'फाटक' म्हणायची.. 
त्या जुन्या घरात दर पावसाळ्यात बाहेर मोठे मोठे गांडूळ, मुंगळे निघायचे.. अंगणात फरशीवर, पायरीवर.. कुठे कुठे.. आम्हाला किळस यायची.. 
घरात अण्णा रोज दुपारपर्यंत देवपूजा करायचे.. आणि आज्जी स्वयंपाक..
मी लहानपणी जेवणाच्या बाबतीत आईला खूप त्रास दिलेला आहे.. हे नको, ते नको.. पण जेव्हा जेव्हा शाळेतून घरी येईन तेव्हा आजीच्या हातचं गरम गरम वरण-भात अन त्यावर साजूक तूप मात्र आवडायचं..
आज्जीचं माहेर म्हणजे आदिलाबाद.. मुळचे मराठीच पण तिकडे स्थाईक झालेले(आता तुम्हाला कळले असेल, चेहऱ्यावरून मी साउथ इंडिअन का वाटते ते..) त्यामुळे तिला वरण, भाजी, सार अतिशय चांगलं जमायचं.. 
रोज दुपारी माडीवर खेळायला जायचे तेव्हा तिथे आज्जीचं छोटंसं कपाट होतं.. त्यातनं ती खडीसाखर काढून द्यायची..तिची अन माझी खूप गट्टी जमायची.. मुळात तिची अन माझी रास एकच, मकर..
आज्जी गेल्यानंतरही अण्णा जेव्हा खडीसाखर द्यायचे, तेव्हा तिची खूप आठवण यायची..
आजही कितीही मोठे झालो तरी जेव्हा अण्णांकडे जाईन तेव्हा त्यांना निरोप देताना हातावर खडीसाखर पडतेच..
घरातला टीव्ही म्हणजे सर्वात जास्त तापदायक.. दररोज गच्चीवर जाऊन अन्टेना फिरवावे लागायचे.. तेव्हा रिमोटहि नव्हता.. रेडीओला जसं बंद-चालू, आवाज कमी जास्त करण्याचं बटन असतं तसंच त्या टीव्हीला होतं.. जे चित्र व्यवस्थित दिसावं म्हणून फिरवायचो.. आता अन्टेना पूर्णपणे निकामी झालाय, केबल आले तरीही टीव्हीचा तोच प्रॉब्लेम चालू असतो.. चित्र व्यवस्थित नाही..
१९९४ साली आज्जी गर्भाशयाच्या कॅन्सरने गेली तेव्हापासून घर अगदी सुनं सुनं वाटायला लागलं.. अण्णाही आधी घरात एकटेच राहायचे..
नंतर अण्णांच्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी मामाने अण्णांना आपल्याकडे ठेऊन घेतलेय.. तेव्हापासून ते तिकडेच असतात..
आताही अधून मधून कधी काम पडले तर जुन्या घरी एखादी चक्कर चालू असते.. तेव्हा देवघर, स्वयंपाकघर, माडी.. सगळं बघून जुन्या आठवणी ताज्या होतात.. 
आता अंगण थोडंसं कमी झालंय.. रस्ता रुंदीकरणासाठी घराच्या बाजूचं अंगण कमी झालंय.. रस्ता तर काही रुंद झालाच नाही.. पण आता त्या मोकळ्या जागेत समोरचे कांबळे मामा त्यांच्या म्हशींना आणून बांधतात..
आज्जीच्या हातची चव मात्र मी अजून विसरू शकले नाही.. मुळात तसं वरणच मी नंतर खाल्लेलं नाही..
एकदा मला आईच्या हातचं वरण अजिबात नाही आवडलं, तेव्हा मी तिला म्हणाले होते, 'तुला आज्जीकडून तिच्यासारखं वरणसुद्धा शिकता आलं नाही.. बहुतेक मला आता तिच्यासारखं वरण तिच्याकडेच वर जाऊन खायला भेटेल..' त्यावेळेस समजलंहि नव्हतं कि मी असं काय बोलले अन आई माझ्यासाठी एवढी का रडली ते..
आज आज्जी-अण्णांचा आशीर्वाद आहे म्हणूनच त्यांची सर्व मुलं, नात-नातू सगळे आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करताहेत..
भूतकाळातल्या त्या आठवणींचा ठेवा, ते आज्जी-अण्णांचं जुनं घर आजही तसंच आहे.. त्यानं पाहिलेल्या, झेललेल्या कडू-गोड आठवणींची साक्ष देत..

Sunday, September 11, 2011

माझी भावंडं


प्रत्येकाला एकतरी भाऊ-बहिण असतेच. सख्खे नसले तरी मावस, चुलत, मामे, आते,.. असतातच.
भावंडांच्या बाबतीत मी अगदी श्रीमंत आहे म्हटले तरी चालेल, माझ्या आईच्या माहेरचे, मावस, मामे असे मिळून आम्ही १६ भावंड आहोत.
हे सगळेच्या सगळे भायलोग म्हणजे बडे काम कि चीज असतात. अगदी रिचार्ज मारण्यासारख्या छोट्यातल्या छोट्या कामापासून ते जॉबसाठी रेझ्युम फोरवर्ड करण्यासारखे सगळे काम त्यांच्याकडून करून घेतले जाऊ शकतात.(कोणी दादा, ताई जर हे वाचत असेल, तर गुस्ताखी माफ..)
आमची मामे-मावस भावंडांची क्रमवारी मलाच आठवायला अवघड जाते: वैभवदा, मनोजदा(मनुदादा), मनीषाताई(माईताई), विनोददादा(मुन्नादादा), पवनदादा, मकरंददादा(टिंकूदादा), सतेजदादा, वर्षा(मी), मंगेश, श्रीकांत, श्रद्धा, सायली, सागर, रोहित, ईश्वरी, आदित्य.. हि उतरत्या क्रमाने नावे.
यात मी मधली आहे. तुमच्या भावंडांत तुम्ही जर मधले असाल, तर तुमची काही खैर नाही..!!
दोन्हीकडून तुमचाच पोपट होणार, हे निश्चित.. चिल्ल्या-पिल्ल्यांसोबत असले तर मोठी माणसं म्हणतात, "तू त्यांच्यांत मोठी आहेस.. तुला कळायला पाहिजे काय बरोबर आहे अन काय चूक आहे ते.."
आणि मोठ्यांसोबत असल्यावर, "ए.. तू गप्प बस.. तू अजून लहान आहेस.. तुला काय कळतंय यातलं?.." चालू असतं.
मग काय करणार बिचारी.. जाएं तो जाएं कहाँ..!!
एकतर छोट्यांना वाटते, कि वर्षूदीदी त्यांची आहे.. तिने त्यांच्यासोबत बुद्धिबळ, पत्ते, कॅरम,.. खेळायला पाहिजे.. आणि दुसरीकडे मोठ्यांची मैफिल जमलेली असते, तिकडे त्यांना वाटते, वर्षूला आता आपल्यात घ्यायला हरकत नाही..
श्रीकांत, श्रद्धा, मंगेश, सायली, सागर, रोहित, ईश्वरी अन आदित्य तसे छोट्या गटात येतात.(त्यापैकी काहीजण हायस्कूल-कॉलेजमध्ये शिकतात तरीही..) त्यांना मी त्यांच्यातलीच वाटते, म्हणून त्यांचे सारे सिक्रेट्स मला माहित आहेत.. आणि मोठ्यांच्या बाबतीतही बऱ्याचशा गोष्टी आता माहित होताहेत.(हा एक फायदा आहे मधले होण्याचा..)
छोट्यांशी खेळताना आपणही केव्हा त्यांच्यातलेच एक होऊन जातो हे कळत नाही.
पण एक गोष्ट मात्र खरी, सगळ्यांमधले नाते तेवढे पारदर्शक असायला हवे. राग-लोभ, रुसवा-फुगवा, थट्टा-मस्करी तर चालतच असतं.. हे तेवढ्यापुरते तेवढे असायला हवे, नाहीतर आपण अन त्यांच्यातलं समीकरण बिघडतं.
माझ्यासाठी माझ्या बाजूने उभी राहणारी माझी फौज म्हणजे हेच सर्व, जे गरज पडेल तेव्हा, जर वेळ आलीच तर, अगदी आई-बाबा, मावशा, काका, मामा,.. सगळ्यांच्या विरुद्ध होऊन माझी साथ देतील.
त्यासाठी मी हि अगदी चिल्लर पार्टीला सुद्धा मस्का मारत असते.(चिल्लर पार्टी म्हणजे छोट्या गटातले..)
जेव्हा जेव्हा आमची सर्वांची भेट होईल, तेव्हा एकदातरी माझी चिल्लर पार्टीसोबत सिक्रेट मीटिंग असते.(सिक्रेट मीटिंग म्हणजे मग ती गोदावरी, गोकुल, सिटीप्राईड,.. कुठेही जेवायला जाणार, पण तेव्हा फक्त आणि फक्त मी आणि चिल्लर पार्टी.. मोठे कोणीही नसणार..) मोठ्यांना मात्र सगळ्यांसोबत कॉमन डिनरला घेऊन जाते.(तसेही मोठ्यांमध्ये जवळपास सगळ्यांची लग्नं झालीयेत.. तुम्ही समजू शकता.. ते तेवढे काही कामाचे नाहीत.. आय मीन त्यांच्याजवळ तेवढा वेळ नसतो..)
मोठे यासाठीच आम्हाला रेल्वेचे डबे म्हणून चिडवतात. असो.
दरवर्षी एकदातरी आमचं रक्षाबंधन/भाऊबीजसाठी गेट-टुगेदर होत असतं, त्यावेळेस सगळे मामाकडे किंवा मावशीकडे जमतो, तेव्हा मात्र मोठे-लहान हा फरक राहत नाही.
आमच्याकडे अगदी मामा लोकांपासून प्रत्येकजण केवळ आयटी/सोफ्टवेअर क्षेत्रातच आहे, कोणीही डॉक्टर नाहीये, चिल्लर पार्टीही गणितामध्येच अग्रेसर आहे..
या बाबतीत सगळ्यांमध्ये एकी आहे.
शेवटी, सगळ्यांनी यशस्वी व्हावे, आणि महत्त्वाचे म्हणजे कितीही दूर गेलो तरीही दरवर्षी एकदातरी भेटण्याची आपली परंपरा अशीच चालू राहावी अशीच मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते.

Saturday, August 20, 2011

ऋतू

मला जर कोणी विचारले कि माझा आवडता ऋतू कोणता, तर माझे नेहमीचे उत्तर म्हणजे ग्रीष्म आणि शरद.
हे दोन्ही ऋतू मला तितकेच आवडतात.
आपल्या भारतीय, वेदिक कॅलेंडरप्रमाणे ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा, ज्येष्ठ-आषाढ महिन्याचा काळ(जून-जुलै) आणि शरद ऋतू म्हणजे हिवाळ्याच्या सुरुवातीचा, अश्विन-कार्तिक महिन्याचा काळ(ऑक्टोबर-नोव्हेंबर).
ऋतू म्हटले कि महाकवी कालिदासाची 'ऋतुसंहार' रचना आठवते. प्रत्येक ऋतूबद्दल अतिशय सुंदर लिहिलेय तिच्यात..!!
मराठीत ऋतूसंहार म्हणजे ऋतूंची माळ असे म्हणू शकतो.(ऋतू आणि संहार अशी जर संधी करत असाल, तर तुम्ही चुकता आहात; इथे ऋतुसंहार हा एकाच शब्द आहे, ऋतूचा संहार(नाश, पाडाव, विनाश..) नाहीये.!)
खरेच.., एकामागून एक माळेसारखे ऋतू बदलत जातात.
ऋतूबद्दल आणखी एक मराठी गीत प्रसिद्ध आहे, आशा भोसलेंनी गायलेले, श्रीधर फडके यांनी कंपोज केलेले 'ऋतू हिरवा, ऋतू बरवा..' (आणखीही दुसरी गीते आहेत, पण मला आता सध्या हेच गाणं आठवतंय..)
इतक्या चांगल्या गाण्याचे व्हीनस कंपनीने वाटोळे केलेय.. अतिशय टुकार अन भिकार चित्रफित (video) तयार केलेली आहे. (यातले नट अन नटी तर त्याहूनही भंकस.. लोल..!!)
असो, आपण ऋतूबद्दल बोलतोय..
ग्रीष्म ऋतू म्हणजे आपला उन्हाळा. एक गरम वातावरण सोडले तर काय मजा असते नाही उन्हाळ्यात..!! शाळा, कॉलेजेसना सुट्ट्या असतात, जॉब करणारेही लाँग हॉलीडेवर जातात. मग मामा, मावश्या, आज्जी-आजोबा.. सगळीकडे थोडे थोडे दिवस राहून चंगळ होते.. मग सर्व मिळून दुपारच्या वेळी एखाद्या जवळच्या ठिकाणी पिकनिकला जाणे, घरून जरी खाण्यापिण्याचे सामान घेऊन गेलो तरी जवळच्या शेतात जाऊन ऊस, कैऱ्या,.., तोडून आणणे.. हे चालतंच. अगदी घरात जरी असलो तरी, जेवणाच्या वेळी सर्व एकत्र बसून जेवण्यातही मजा येते. मग त्यातही जर आमरसाचे जेवण आणि टीव्हीवर आवडीचा सिनेमा, प्रोग्रॅम असेल तो क्या बात है..!
मग गप्पांचा फड जमतो किंवा बाहेर ऊन असतं म्हणून घरातच पत्ते, कॅरम,.. असे काहीतरी चालू होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबे याच सिझनमध्ये मिळतात. आंब्याला फळांचा राजा काही उगाच म्हणत नाहीत.. कैरी, आंब्यापासून कितीतरी पदार्थ तयार होतात.., कांदा-कैरी चटणी, आमरस, साखरआंबा, तक्कू, पन्हं, इ.इ..
उन्हाळ्यातली रात्र म्हणजे अतिशय थंडगार. दिवसभर गरम असलेले वातावरण अगदी थंड होऊन जाते. मग चांदण्या रात्री गच्चीवर आज्जी-आजोबांच्या गोष्टी ऐकण्यात रात्र कशी निघून जाते ते कळतच नाही.
वट पौर्णिमा, गुरु पौर्णिमा, आषाढी एकादशी,.. हे सगळे सण-वार ग्रीष्मातले.
शाळेत असतानाची एक कविता आठवते, 'ग्रीष्मातल्या सकाळी, आले भरून मेघ.. अन विस्कटून गेले, सारे प्रभात रंग.. पाहून मम उदासी, चाफा हसून बोले, सद्भाग्य केवेढे हे, आले भरून मेघ..'
अशा या गरम वातावरणात पावसाची एक हलकीशी सरही मनाला थंडावा देऊन जाते.
माझा दुसरा आवडता ऋतू म्हणजे शरद. इंग्लिशमध्ये याला ऑटम (autumn) म्हणतात. हा हिवाळा सुरु होण्या आधीचा काळ. या दिवसांमध्ये, पावसाळा नुकताच संपलेला असल्याने वातावरण अतिशय आल्हाददायक, उत्साहपूर्ण असतं. नवरात्र, दसरा, दिवाळी, कर्तिक पौर्णिमा,.. हे उत्सव शरदातले.
'शरदाचे चांदणे' नावाची दूरदर्शनवरची सीरिअल आठवते. शरद हाडप यांचा कथासंग्रहहि 'शरदाचे चांदणे' याच नावाने आहे.
शरद ऋतूला पानझड, पानगळ याही नावाने ओळखले जाते. या दिवसात जवळपास सर्वच झाडांची पानगळ होते, झाडांच्या नुसत्या फांद्या, बुंधे शिल्लक राहतात आणि खाली वाळलेल्या पानांचा सडा पडलेला दिसतो.
अशावेळेस वातावरणात वेगळीच रंगसंगती दिसून येते. पावसाळ्यात तरी केवळ हिरवळ दिसते. पण पानगळीच्या दिवसात, सगळेच रंग दिसतात, हिरवे गवत, त्यावर पडलेली विविध रंगांची वळलेली पानं.. सगळ्यात रंगीबेरंगी ऋतू आहे हा.
वाळलेल्या पानांवरून मुद्दाम चालत जाताना त्यांचा 'चर्रर्र.. चर्रर्र..' आवाज ऐकायला कोणाला नाही आवडत..!!
अशावेळेस कुठल्यातरी गूढ आठवणी ताज्या होतात. (प्रत्येक गूढ, रहस्यमयी,.. चित्रपटात, कादंबरीत, गोष्टीत याचा कुठेना कुठेतरी संदर्भ येतोच.. म्हणून असेल कदाचित..)
या ऋतूत झाडांवरची जुनी, खराब झालेली, वळलेली पाने गळून पडतात, कारण त्याजागी नवीन येणार असतात.
शारदातली हि पानगळ म्हणजे आजपर्यंतच्या ज्या काही खराब, वाईट गोष्टी घडल्या, त्यांना पायदळी तुडवून उद्या जे घडेल, ते नवीन, चांगलेच असेल आणि झाडे जशी त्यांच्यावर फुटणाऱ्या नवीन पालवीच्या स्वागताला सज्ज होतात, तसेच आपणही आपल्या चांगल्या भवितव्यासाठी उत्साहाने सज्ज व्हायला हवे, हेच तर सुचवत नसेल?
उद्या तुम्ही, मी आपण, या जगाच्या पसाऱ्यात कुठेही असू शकतो, पण हा 'ऋतुसंहार' मात्र जिथल्या तिथेच असणार आहे.. अगदी अगणित काळापासून अगणित काळापर्यंत..!!

Wednesday, May 25, 2011

'ईश्वरी'

तिचा जन्म २५ ऑगस्ट २००० ला झाला.
माझा बर्थडे सप्टेंबरमध्ये अन तिचा ऑगस्ट म्हणजे माझ्या आधी येणार म्हणून मला सगळे चिडवायला लागले.
तिच्यात अन माझ्यात १२ वर्षांचे अंतर आहे.
ती जन्मली तेव्हा नांदेडच्या पाचलेगावकर महाराजांच्या मठातल्या गोविंद महाराजांकडून तिचे नामकरण 'ईश्वरी' उर्फ 'तपस्या' असे केले.
ईश्वरी हे देवीचे, म्हणजे आमच्या कुलदेवतेचे, तुळजाभवानीचे नाव म्हणून तिला ईश्वरीच म्हणतो..बाकी तपस्या फक्त शाळेच्या रेकॉर्डपुरते.
ती जन्मली तेव्हा मी परभणीला मावशीकडे शिकायला होते, उन्हाळ्याच्या सुट्टीत नांदेडला आले तेव्हा ती ६ महिन्यांची झाली होती, इतके दिवस आम्ही एकमेकींना पाहिलेही नव्हते.
आधीपासून आई मला सांगायची कि ती खूप तडतडी झालीये, माणसं ओळखतेय अन आई-बाबांशिवाय कोणाजवळही जात नाही...मग मी जरा घाबरत घाबरतच तिला कडेवर घेतले..लाडाने जवळ घेऊन बोलायला लागले..
आश्चर्य म्हणजे ती अजिबात रडली नाही आणि मी तिला 'ओ..' म्हणाले, ती रिप्लाय द्यायला लागली 'ओ..' जितका वेळ मी 'ओ.. ' म्हणाले, तेवढा वेळ ती माझ्यापाठोपाठ 'ओ.. '
म्हणाली..हा प्रसंग अजूनही जसाच्या तसा मला आठवतो, अगदी पहिल्याच भेटीत तिने आपल्या बहिणीला ओळखले होते.
ती रांगायला लागली तेव्हा मात्र तिच्यावर जास्त लक्ष ठेवावे लागत असे.. बहिणीच्या ओढीमुळे मी हि नांदेडला शिफ्ट झाले.
मी शाळेत जायला निघाले कि तिला वाटायचे मी कुठेतरी बाहेर जातेय..मग ती अगदी बेडवर असली तरीही रांगत रांगत जवळ यायचा प्रयत्न करायची..एकदा-दोनदा ती पडलीही होती बेडवरून..पडली तरी धडपडत,रडत बाहेर येण्याचा प्रयत्न करायची.
आमच्या आजोबांना आम्ही 'नाना' म्हणतो, तेही आमच्यासोबतच राहतात.. दररोज रात्रीच्या त्यांच्या जेवणाच्या वेळेस रांगत आजोबांजवळ जाऊन म्हणायची,"नाना, बो..", म्हणजे 'नाना, बोलावलंय'..
एकदा माझे ट्युशनमधले सर घरी आले होते, ते मला अभ्यासावरून रागवायला लागले..तर हि उलट त्यांनाच 'ऑ.. उ..'असे काहीतरी बोलून रागवायला लागली..रागावणं सोडून सरही हसायला लागले.
आई-बाबा लाडाने दोघींनाही कधी कधी 'मन्या' म्हणतात..तेव्हा हिचे सुरु होते.."ऑ.. मी आहे मन्या..ती नाही.."
पण आई-बाबा बाहेरगावी गेले, कि तिचा मोर्चा माझ्याकडे वळतो.. तिला कितीही रागावले, कितीही मारले, तरीहि शेवटी ती जवळ येते..
ती कॉमेडीहि करते.. तिचा सेन्स ऑफ ह्युमरही चांगला आहे..
काही दिवसांपूर्वीच आमच्या शेजारी नवीन कुटुंब राहायला आले.. काकू कन्नडिगा अन काका मराठी..घरात बोलताना काकू कन्नड बोलायच्या..आपल्यात जसे नवऱ्याला हाक मारताना,'अहो..' म्हणतात, तसे कन्नडमध्ये, 'री..' म्हणतात..काकूही काकांना 'री..' म्हणून हाक मारायच्या..त्यांचा मुलगा, ध्रुव, आमच्याकडे इशुसोबत खेळायला आला.. आजोबांनी इशुला त्याचे पूर्ण नाव विचारले..त्यावर ती बोलली,"ध्रुव.. ध्रुव 'री' साखरे.."..घ्या..काकांचे नाव रवी आहे..हिला वाटले काकू 'री' म्हणतात म्हणजे त्यांचे नाव 'री'च आहे.. तेव्हापासून काकूंनी 'री' म्हणणे सोडून दिलेय..
मी सोडून तिच्यावर कोणीही हात उगारला तर मला राग येतो..आई-बाबा म्हणतात मी जरा जास्तच प्रोटेक्टिव होते तिच्याबाबतीत..
मला कधीही कुठल्याही गोष्टीसाठी अडवले गेले नाही..पण मी तिला अडवते..अगदी आई-बाबा तयार असले तरीही..कारण मला तिची काळजी वाटते..माहित आहे मला..सगळ्या एल्डर सिस्टर्स अशाच असतात..
एक गोष्ट मात्र मला मनापासून वाटते, कि ती आली म्हणूनच मी इंजिनिअर झालेय.. कारण मला मार्ग सापडला.. आपल्यावर कोणीतरी डिपेंड आहे.. आपल्या सावली सारखीच आपल्या मागे येणारी कोणीतरी आहे..हि जाणीव व्हायला लागली.. आत्तापर्यंत मला ज्या गोष्टी मिळू शकल्या नाही.. ते सर्व तिला मिळावे अशी माझी इच्छा आहे..माझ्यापेक्षाही तिने शिकून खूप मोठे व्हावे.. असे वाटतेय.. मला माझ्या जगण्याची दिशा सापडलीये.. आणि शेवटी आम्हा दोघींना एकमेकिंचाच तर आधार असणार आहे ना..!!